Monday, March 19, 2018

चाफा !

चाफा !
हा वासाचा चाफा नाही बरं का..हा आहे मोठ्ठं चार पाकळ्यांचं फूल असलेला चाफा. एव्हाना या चाफ्याची आठवण सर्वाना फक्त गुढी पाडव्यालाच येते.
पण माझ्या खूप मौल्यवान लहानपणीच्या आठवणी या चाफ्याने जपलेल्या आहेत. आजीच्या आणि आमच्या घराच्या बरोबर मधल्या भागात एक पडकं घर होतं, रस्त्यापासून बऱ्याच उंचीवर होतं ते. त्या घराच्या समोर असं एक उंच चाफ्याचं झाडं कित्येक वर्ष उभं होतं. आजी आणि आई आणि माझी मोठी काकू अश्या तीन घरी गुढी उभारली जायची, आणि त्या गुढीला सजवायला आणि पुजायला चाफा हा हवाच. याची मक्तेदारी दिली जायची मी आणि माझ्या चुलत भावाकडे. इतर दिवशी जर आम्ही शाळा सुटल्यानंतर त्या पडक्या घराजवळ भटकायला गेलो तर उगाच एखादे काका जाता येता हटकायचे आम्हाला. पण ती आमची गुप्त जागा होती बऱ्याच गोष्टी करायला. उन्हाळाच्या सुट्टीत मातीची छोटी भांडी बनवून त्या झाडाखाली छोटी शेकोटी करून ती भाजल्याच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. शेजारीच बाभळीचं एक खूप उंच झाड पण होतं, जिथं झाडाला खाच पाडून ठेवून नंतर आम्ही काडेपेटीच्या मोकळ्या डबीत डिंक गोळा करायचो, कधी शेजारच्या झाडीतून सुरवंट उचलून बरेच दिवस त्याला डबीत कोंडून ठेवून फुलपाखरू नाही झालं म्हणून नाराज व्हायचो. याच परिसरात रान वांग्यांची झुडुपं पण होती. एकदा आईला हि वांगी नेऊन दिल्याचं पण आठवतं. दिवाळीच्या शेवटच्या दिवशी फुसके फटाके शेकोटीत दुरून फेकत बसण्यासाठी पण याच जागेची निवड केली जायची. तर अशी ही पडक्या घराच्या आसपासची जागा आमचा अड्डा होती. चाफ्याचं झाड म्हणजे आमचं खास. थंडी संपून थोडे दिवस गेले कि हे झाड फुलांनी भरू जायचं. मग आम्ही इथं जमून कुठं त्या फुलांच्या अंगठ्याचा कर, ससाच बनव असले उद्योग करायचो. गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी मात्र गल्लीतली सगळी आमच्यासारखी शाळकरी पोरं पोरी या झाडाखाली जमा व्हायची चाफ्याची फुलं तोडायला आणि गोळा करायला. झाड पूर्ण भरलेलं असायचं, बरीच फुलं खाली पडलेली असायची. शेजार पाजारच्या मुली उगाच खालची फुलं वेचायच्या आणि लवकर पळ काढायच्या. मुलं उगाच भाव मारायला वर वगैरे चढायची आणि फुलं पाडून द्यायची. आमचा तर अड्डा असल्यानं आम्हाला कुठून कसं चढायचं आणि फुलं कशी मिळवायची याची युक्ती माहित होती. आम्ही आपला सुमडीत भरपूर फुलं गोळा करायचो आणि आमच्या नेहमीच्या ठिकाणी गप्पा मारत अंधार पडायची वाट बघायचो. दुसऱ्या दिवशी शाळेला सुट्टी असायची आणि कळक धुवून पुसायचं काम वडील स्वतः करायचे. त्यामुळं घरी फुलं नेऊन पोचवली कि बहिणाबाई लगेच हाराच्या कामाला लागायच्या आणि मस्त चाफ्याचा हार तयार व्हायचा. आजीच्या घरी फुलं पोचवली की एखादा डिंकाचा लाडू हातात मिळायचा चरायला. तो चरत चरत दुसऱ्या दिवशीच्या सुट्टीचा बेत बनायचा गल्लीतल्या मित्रांबरोबर. सकाळी मस्त गुढी उभारून झाली, कि आम्ही रिकामे सगळ्यात मोठी गुढी शोधायला. बहुदा पहिला नंबर काकूच्या गुढीचा असायचा. मजा यायची गोड गोड नाश्ता करताना. पण काका ते कडूलिंबाचा पाला आणि गूळ खायला लावायचे प्रसाद म्हणून ते बिलकुल आवडायचा नाही मला. तिथं खाऊन मोहरीत जाऊन थुंकायचो बहुदा मी. आता ना ते झाड़ आहे ना आमचा अड्डा, पण माझ्या मनात मात्र चाफा नक्कीच आहे !
आज अचानक मी सहा वर्षा पूर्वी काढलेला चाफ्याच्या फुलाचा फोटो फेसबूक ने आठवण म्हणून दाखवला अगदी जुन्या आठवणी जाग्या झाल्या. बरेच दिवस लिहिलं नव्हतं, आज सगळंच जमून आलं. सण हे आपल्या आठवणी जपण्याचं आणि आठवणी निर्माण करण्याचं एक निमित्त आहे असं मला नेहमीच वाटतं. धर्म आणि संस्कृती यापलीकडे सणांचं बरंच महत्त्व आहे एवढं मात्र निश्चित.
गुढी पाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हॅपी उगादी.
शकुन
१७ मार्च २०१८

Friday, July 15, 2016

पूर्णविराम 



पूर्णविराम आणि मी यांच्यात एक अतूट नातं आहे कदाचित, आम्ही एकमेकाला नेहमीच हुलकावणी देत राहतो.  मार्शाच्या  टाइपराईटर बरोबर  आम्ही असच खेळत होतो तेव्हा त्यातला पूर्णविराम मला सगळ्यात जास्त आवडला, अगदी ठळक होता तो ! पण मला एक गोष्ट नेहमी वाटते, आपल्या आयुष्यातले पूर्णविराम एवढे ठळक असतात का कधी? की सुरू झालेलं सगळं फक्त शेवटच्या श्वासाने संपतं ? तोच खरा पूर्णविराम का? 

आपल्याला एखाद्या गोष्टीत रस निर्माण होतो लहानपणापसून, खूप जवळचे मित्र मैत्रिणी बनतात , एखादी व्यक्ती आवडते, एखादं  पुस्तक खूप आवडतं, एखादा विषय जिव्हाळ्याचा बनतो, आपला शेजार, आपलं घर, आपलं गाव, आपला देश या सगळ्यात आपण खूप गुंतून जातो, मनात कुठेतरी या सगळ्या गोष्टींची छाप निर्माण होते. पण त्यात कधी पूर्णविराम असतो का? 

आपण जसजसे मोठे होतो तसं आपण व आपल्या सभोवतीचं सगळंच बदलत असतं, शाळेच्या मित्रांच्या जागी कॉलेज चे मित्र येतात, अजून कुठलं  तरी पुस्तक आवडतं, आपण नवीन शहरं, नवीन देश, नवीन लोक यांच्यात मिसळून जातो. टाइपराईटर च्या जागी कॉम्प्युटर येतो, कॉम्प्युटर  च्या जागी स्मार्ट फोन, मग टॅबलेट .. सगळ्यात पूर्णविराम असतो, पण ठळक नसतो बहुतेक. 

आपल्या सगळ्यांची स्वप्न असतात, इच्छा असतात , जबाबदाऱ्या असतात, कर्तव्य असतात. हे सगळं काळानुसार आणि वेळेनुसार बदलत पण असतं. पण या सगळ्याला पूर्णविराम असतो का कधी ? एखादी आवडलेली गोष्ट, ते व्यसन का असेना थोड्या काळासाठी पुसट होते, धूसर होते, पण त्याची मनावरची छाप कधी कमी होत नाही . ज्या गोष्टींना पूर्ण विराम दिला असं वाटतं, त्या पुन्हा कधी कशा कुठे मनात उफाळून येतील कोणी सांगावं ! 

खरंच आपण कुठल्याही गोष्टीला  मार्शाच्या टाइपराईटर सारखा पूर्णविराम देऊ शकतो का ? आपण पान बदलू शकतो वहीतलं, नवीन वही घेऊ शकतो पण आधीच्या पानावर काय लिहिलं  होतं हे आपल्या एवढं घट्ट मनात बसलेलं असतं.  कुठल्यातरी वळणावर आपण पुन्हा ते पान उलटण्याचा प्रयत्न करतो, ते वाचून खुद्कन हसणार असलो तरी किंवा त्यावरची अक्षरं अश्रूंनी मिटली असली तरी. 




Thursday, October 8, 2015

चहा !

चहा !

चहा! चाय ! चाया ! टी ! कटिंग! स्पेशल ! ही सर्व शब्दावळ  एकाच भावनेशी जुळलेली आहे, चहा हे पेय नसून तो एक आनंद आहे, उत्साह आहे, सखा आहे सोयरा  आहे. चहा पोटात नव्हे तर मनात जातो. तो नेहमीच  मनाशी जुळलेला असतो, लहानपणी दुधात रंग येण्यापुरता चहा टाकून द्यायची आई, तेव्हापासून हा आवडता.
चहा हा कधीच सारखा नसतो. दररोजचा चहा हा काहीतरी विषेश असतो, अगदी आयुष्यभर ! आईने बनवलेला चहा, स्वतः बनवलेला चहा, काळा  चहा - गोरा चहा, कमी साखरेचा चहा - खडी चम्मच चहा, ष्ट्रोंग चहा - फिका चहा, आल्याचा चहा - इलायची चहा, सकाळचा चहा - दुपारचा चहा, घरातला चहा - ऑफिसातला चहा- टपरीवरचा चहा - कॉलेग कॅन्टीन चा चहा, मित्रांबारोबारचा चहा - मैत्रिणी बरोबरचा चहा, बिस्कीटा बरोबरच  चहा - सिगारेट बरोबरचा चहा, पावसातला भजी बरोबरचा  चहा - थकून उन्हात उभारत घेतलेला चहा, टेबल वर बसून घेतलेला चहा - बाल्कनीत उभारून पिलेला चहा, शांतपणे पिलेला चहा- फुरक्या मारत पिलेला चहा, वेळ जात नसतानाचा चहा - परीक्षेआधी रात्री पिलेला चहा, कादंबरी वाचतानाचा चहा - अभ्यासाबरोबरच चहा, एव्हाना स्वतः पिलेला चहा - कुणीतरी पाजलेला चहा, पावडर वाला चहा किंवा गवती चहा,  असे असंख्य प्रकारचे चहा आपण आपल्या आयुष्यात अनुभवतो.   एवढं मात्र खरं , चहा नेहमी 'हाय-टी'च  असतो , तो 'लो' कधीच नसतो.

चहा भारतात कसा आला, कुठून आला याच्या बद्दल फारसं मला माहित नाही पण , ब्रिटीशांच राज्य भारतावर होतं  ते निव्वळ चहा मुळेच असं  माझं  ठाम मत आहे! बाकी मसाले वगेरे हा सर्व 'मसालाच' ! चहाचं  माझ्या आयुष्यातलं महत्त्व फार मोठं आहे, चहाचे मळे असलेली भारतातली बरीचशी थंड हवेची ठिकाणी मी पालथी पडलेली आहेत आणि उरलेली माझ्या यादीवर आहेत. त्यांचं वैशिष्ट्य हे पण चहा सारखंच वेगळं आहे. गरिबांचे मळे, सरकारी मळे, राजकारण्यांचे मळे, उद्योजकांचे मळे - पण चहामध्ये या सगळ्यांची चव कधीच उतरत नाही, चहा हा सर्व मळ्यामधून सारखाच बाहेर येतो. सर्वाना सुखावणारा, त्राण कमी करणारा, जवळीक वाढवणारा, तरतरी आणणारा. गरीबाच्या झोपडीतला चहा, छोटू चा चहा, पंचतारांकित हॉटेलातला चहा किंवा मध्यम वर्गीयांच्या घरातला चहा सगळे तितकेच 'स्पेशल'! दूध आणि उकळलेल पाणी मिसळून बनवलेला चहा किंवा सर्व एकत्र टाकून उकळलेला चहा, साखर आधीच टाकलेला चहा किंवा नंतर आवडीप्रमाणे साखर टाकलेला चहा, गुळाचा चहा किंवा मधुमेह वाल्या लोकांचा खोटी साखर टाकलेला चहा - सगळे तितकेच 'गोड' असतात.

चहा हा एक असा मित्र आहे कि जो आबाल्वृद्धाना बांधून ठेवतो, कॉलेग कट्ट्यावरचा मित्रांचा ग्रुप असो, किंवा ऑफिसात सिगारेट आणि चहासाठी भेटणारा गट असो किंवा मॉर्निंग वॉक  नंतर भेटणारा म्हातार्या कोतारयांचा  ग्रुप असो,  सगळ्यांना तितक्याच ताकदीने एकत्र बांधून ठेवणारी शक्ती म्हणजे चहा. चहा ची किंमत ही  कधीच पैशात मोजता येणार नाही, कारण चहा वरच्या चर्चा, गप्पा, टीम मीटिंग, वाद-विवाद, प्रेम हे सगळं खूपच अनमोल आहे. अश्या या चहा-प्रिय भारतात पंतप्रधानही एक चहा वालाच झाला यात काहीच नवल नव्हे! 

Monday, September 21, 2015

गणेशोत्सव - माझा दृष्टीकोन







मी देव या संकल्पनेला मानतो वा नाही ही गोष्ट वेगळी, पण मी गणेशोत्सव तितक्याच उत्साहात दरवर्षी साजरा करतो. गणपतीची मूर्ती असणं वा नसण, छोटी असणं किंवा मोठी असणं हा मुळात प्रश्नच नसतो. प्रश्न असतो लहानपणापासून करत आलेल्या दहा दिवसाच्या आनंदोत्सवाचा, आपली संस्कृती जपण्याचा, त्याची पाळंमुळं शोधण्याचा आणि आठवणींना उजाळा देण्याचा. बोबड बोलत असल्यापासून म्हणत आणि ऐकत असलेल्या आरत्या पुन्हा एकदा दहा दिवस म्हणण्यात खरच मजा आहे. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असलो तरी आपली पारंपारिक वाद्य वाजवून मिरवणुकीत नाचाण्यात मौज आहे वेगळीच ! बर्गर आणि पिझ्झाच्या देशात उकडीचे मोदक खाणं म्हणजे परमसूख आहे. 

टिळकांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी लोकांना एकत्र आणायला गणेशोत्सव सुरु केला, तो आम्ही इतर वेळी आपापल्या उद्योगात मग्न असणाऱ्या मित्रांना एकत्र आणण्यासाठी चालू ठेवलाय एवढंच. धिक्चाक गाणी इतर वेळी ऐकणारे आम्ही गणेशोत्सवात का होईना दोन-चार भक्तीगीते ऐकतो, टी शर्ट आणि थ्रीफोर्थ घालणारे आम्ही एक दिवस कुर्ता पजामा घालतो, संस्कृत सारख्या भाषेतले श्लोक म्हणून ओठांचा आणि स्वरयंत्राचा व्यायाम करतो. अर्थ कळत नसला तरी, कुठंतरी मनाला शांती लाभते. मंद प्रकाशात संगणकावर काम करणारे आम्ही गणपतीशेजारी रोषणाई करतो, घरांमध्ये गणपतीची आरास पण मखर लावूननच करतो. आपली संस्कृती जपण्याचा एक अनोखं सूख मिळतं, आई वडिलांची शिकवण आचरणात आणल्याचा अभिमान वाटतो आणि एकटेपणाचा लवलेशही जाणवत नाही. 'गणपती बाप्पा ऽऽऽऽ 'मोलया च मोरया' होऊन पण खूप वर्ष झाली, तरीही ते आवडतं म्हणायला एवढंच ! _/\_

Saturday, May 2, 2015

When I say I want to travel...



When I say I want to travel I don’t mean I want to stay at resorts and go on tours with tour guides or buy key chains from souvenir shops. I don’t want to be a tourist. 

When I say I want to travel I mean I want to explore another country and become part of it. I want to discover small coffee shops in Germany and Italy and France. I want to walk on beaches in Australia and browse the book stores of England. I want to hike the Great Wall of China and go cliff diving in Hawaii I want to meet people who are not like me, but people who I can like all the same. I want to take pictures of things and places and people I meet. I want my mind to be in constant awe of life on earth. I want to see things with new eyes. I want to look at a map and be able to remember how I was transformed by the places I’ve been to the things I’ve seen and the people I’ve met. 

I want to come home and realize that I have not come home whole but have left a piece of my heart in each place I have been. This, I think, is what is at the heart of Adventure and this is why I plan on making my life one

~ reblogged

Thursday, April 30, 2015

डाळकांदा



तुरीची डाळ गाळ शिजू न देता अलगद बाजूला करायची, फोडणी वर कांदा भाजून जरा तिखट आणि कोथिंबीर घालून वाफ आणली की झाला डाळ कांदा तयार! अत्यंत चविष्ट, झटपट आणि सोपी पाककृती. आमच्याकडे दर सोमवारी बनतो हा डाळकांदा, अगदी साधा, माझ्या पप्पांसारखा!

शाळेत असताना पासूनच  आठवत,  दर सोमवारच्या डब्यात डाळकांदा असायचा. मला खूप आवडायचा अशातलं  काही नाही पण काही मित्रांना खूप आवडायचा म्हणून मी पण खुश असायचो, त्यांच्या डब्यातलं पण ताव मारून खाता यायचं. दर सोमवारचं  हे मात्र ठरलेलं. नंतर शाळा संपली, डबा सुटला, डाळकांदा मात्र दर सोमवारी सकाळी ठरल्याप्रमाणे बनतच राहिला… नंतर कधी कॉलेजातून सुट्टीला घरी आलो कि डाळकांदा खायला मिळायचा, मग आवडायला लागला.

पण हा आमच्या घरी का बनवायचे दर सोमवारी सकाळी? माझ्या पप्पांचा आवडता आहे म्हणून. गेली कित्येक वर्ष पप्पा नोकरी निमित्ताने कोल्हापूर ला आहेत, निम-सरकारी नोकरी. आठवड्याला जाऊन येऊन करतात. सोमवारी सकाळी ७-८ वाजता निघालं की ऑफिस च्या वेळेत कोल्हापुरात दाखल. पाच दिवसाचा आठवडा आणि परत शुक्रवारी संध्याकाळी निघून सातारा! पप्पा दर सोमवारी डबा घेऊन जायचे, डाळकांदा आणि डाळ वांग त्यांच्या आवडीच. डब्यातून हेंडकाळू नये म्हणून डब्यात डाळकांद्याची निवड. हा सोमवारचा डबा पप्पा दुपारी व संध्याकाळी दोन वेळा खात. पैसे वाचवणे आणि बायकोच्या हातचं खाणे असे दोन्ही हेतू होते बहुतेक त्या मागे…

दर सोमवारी पप्पांना एस्टी स्थानकावर दुचाकीनं  सोडायला जावं लागायचं. आईला गाडी चालवता नव्हती येत तेव्हा. आईला गाडी शिकवायचे पप्पांचे बरेच प्रयत्न असफल ठरले.  आम्ही तीन भावंड लहान होतो तेव्हा कसे जायचे आठवत नाही पण आमच्याकडे बजाज ची एम ८० होती, दादा गाडी चालवायला लागल्यापसूनच आठवतं, तो जायचा सोडायला. मग तो शिकायला बाहेर गेला तेवा चुलत भाऊ जायचा एम ८० घेऊन, हिरो होंडा आल्यावर ती घेऊन. नंतर स्कुटी पेप आली, तेव्हा दीदी जायची सोडायला, मग मी पण गेलो मोठा झाल्यावर. गाड्या बदलल्या, सोडायला जाणारी माणसं बदलली तरी डब्यात मात्र ठरलेला मेनू … डाळकांदा! आई दर वेळी अगदी प्रेमाने डबा बनवून द्यायची. आई नोकरी करत होती तेव्हाचं  आठवत , काही वेळा डाळ रात्रीच शिजवायची आणि मग सकाळी उठून परतून डाळकांदा तय्यार, पप्पांच्या वेळेत!

अगदी गरिबीतून शिक्षण पूर्ण केलेले. घरची परिस्थिती हलाखीची असल्यानं पप्पा शिवणकाम करता करता शिकले . आजी सांगायची, रात्री उशिरा पर्यंत शिवण करून सकाळी उठून अभ्यास करायचे परीक्षेच्या वेळेस. परिश्रमांचा चीज झालं, सरकारी नोकरी मिळाली, शिवणकाम चालूच होतं. माझी आई मात्र पप्पांची निवड, लहान पणापासून एकाच वाड्यात राहिलेले. लग्न झालं आणि आम्ही तिघे पण झालो समीर, स्नेहल आणि  मी शेंडफळ - शकुन. पप्पांची शकुनी गणपतीवर फार श्रद्धा. साताऱ्यात असले कि दररोजच जाण ठरलेलं. गणपतीला आवडणार गूळ खोब्र त्याचं पण फार आवडत. आजी सांगायची लहानपणी खोबऱ्याची वाटी पळवून पसार व्हायचे, आणि फस्त करायचे. माझे पप्पा पण शेंडफळ, पाच भावांच्या पाठचे. म्हणून चालत असेल कदाचित.

पप्पा अगदी शिस्तप्रिय. घरात अस्ताव्यस्त काही पडलेलं त्यांना आवडत नाही. शुक्रवारी संध्याकाळी आमच्या घरात उचला उचलीचा कार्यक्रम ठरलेला,जेणेकरून घर नीटनेटक दिसावं. तापट स्वभावाचे, जरा घाबरूनच असतो आम्ही त्यांना. पण आमच्या तिघांच्याही शिक्षण व इतर मागण्यांसाठी  पप्पानी कधीच हाईघाई केला नाही, हवं ते सगळं पुरवलं. सोमवारच्या संध्याकाळी पण घरचाच डबा खाल्ला त्यांनी.. गेली कित्येक वर्ष. 

दादाचं शिक्षण झालं, वहिनी आली, मी शिकायला बाहेरगावी गेलो, दीदी लग्न होऊन सासरी गेली, पप्पा आजोबाही झाले… तरी नोकरी मात्र कोल्हापूरलाच होती, सोमवार-शुक्रवार चं जाणंयेणं ठरलेलं. डब्यातही तेच  - आईने बनवलेला डाळकांदा.. वयाच्या पन्नाशी नंतर पण पप्पांचं  कोल्हापूर काही सुटलं नव्हतं. दादाने चार चाकी घेतली, तरी देखील पप्पांना सोडायला दुचाकीवरच जायचं कोणीतरी.

गेल्या २ वर्षापूर्वी कुठल्यातरी ड्रायव्हिंग स्कूल मध्ये जाऊन आईला पपांनी दाखल केलं. स्वतःची कामं चटकन करता यावीत म्हणून आई पण शेवटी दुचाकी चालवायला शिकली. मग आता तिचं अजून एक काम वाढलं, पप्पांना गाडीवर एस्टी स्थानकावर सोडायला  जायचं. तीही सगळं आवडीने करायची डाळकांदा आणि मग सोडायला जाणं. पप्पानाही ते आवडायच, कधी पासूनची त्यांची इच्छा पूर्ण झालेली, आईने गाडी चालवायची.

१६ एप्रिल ला पप्पांचा आणि दादाचा वाढदिवस झाला, त्याच दिवशी सुदैवाने दादा-वहिनीला दुसरी मुलगी झाली. पण हा पप्पांचा खास वाढदिवस होता, ५८वा !  ३० एप्रिल ला निवृत्ती, कोल्हापुरातला आणि नोकरीतला शेवटचा दिवस असणार...

काल सोमवार होता, खूप वर्षांचं गणित अजूनही तसच होतं… आई-पप्पा सकाळी लवकरच उठतात. पप्पा शकुनी गणपतीला जाऊन आले निघण्यापूर्वी. सोडायला येण्यापूर्वी स्वयंपाक करताना पप्पांनी आईला  सांगितलं, "आजचा डाळकांदा छान कर."   पप्पांना भरून आलं होतं, सोडून आल्यावर आईने फोन वर सागितलं.

Tuesday, October 28, 2014

खारट.

समुद्राचं पाणी…क्षणात पुढं येतं , रुक्ष किनाऱ्याला ओलावा देतं , लाटांच संगीत ऐकवतं , कधी शंख-शिंपले देतं  तर कधी मोती… आपलसं होतं …. भरतीनंतर ओहोटी येणार  हे मात्र आपण विसरूनच जातो जणू… पायाखालची वाळू सरकते तेव्हाच भानावर यायला होतं!
ओहोटीच्या समुद्रकिनारी उभा आहे मी,  अगदी पायाशी खेळणारं पाणी..  दूर चाललंय आणि मी मात्र घट्ट मनाने दूर  जाणाऱ्या पाण्याकडे शांतपणे बघण्यावाचून काहीच करू शकत नाही .. अगदी क्षितिजापर्यंत.